रोज उठून देवाचं दर्शन घ्यावं तसं 'फेसबुक' देवाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस कसा बरा जात नाही.
'फेसबुक'वर  एकदा भेट दिली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. फोटो अपलोड, फोटो  शेअर, लाइक, कॉमेंट्स केल्या म्हणजे कसं जरा आयुष्यात चैतन्य आल्यासारखं  वाटतं. आणि हो चॅट तर विसरलेच! चॅटसाठी अपॉइंटमेंट्स ही ठरलेल्या असतात.  थोडक्यात काय, तर 'फेसबुक' हे आयुष्य झालंय. अनेकांचं...! 
जुने  मित्र-मैत्रिणी भेटतात आणि नवेही मिळतात...त्यांच्याशी आयुष्यातला  'व्हर्च्युअल' क्षण शेअर होत जातो आणि पाहता पाहता या भासमान जगातच  स्वस्थता वाटायला लागते... 
प्रश्न असा आहे की या भासमान, भ्रामक जगाचा फायदा काय? 
'फेसबुक'मुळं आपल्याला काय मिळतं? आपल्या आयुष्यात काही बदल झाला आहे का? की मानसिक समस्या (सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स) वाढल्या? 
'फेसबुक'वर वारंवार प्रेमात पडणं आणि आपटणं...पुन्हा उभं राहून पुन्हा नव्या जोशानं प्रेमात पडणं... 
5-5  तास चॅटिंग करणं...सर्फिंग करणं...या सगळ्या प्रकारात आपण पोकळ होत चाललो  आहोत? यातून येणारी प्रचंड अस्वस्थता आपल्याला पोखरत चाललीय? फेसबुकवर  फ्लर्ट करून मिळणारी उत्तेजना (एक्साइटमेंट) आणि एका समृद्ध, सुंदर  नात्यातला आनंद यातला फरक आपल्याला समजेनासा झालाय? 
या  भासमान जगाला खरे आयुष्य मानून आपण खऱ्या आयुष्याकडे पाठ फिरवत असू, तर  आयुष्य आपल्यावर डिसलाइक क्लिक करेल...आणि हो, हे पटलं तर 'फेसबुक'वर जरूर  शेअर करायला विसरू नका!! 

 
 
No comments:
Post a Comment